बुधवार, ५ मे, २०२१

Rain or Shine.


Once upon a time in head office, (Ward) was our meeting for office matters and once in it, there was an introduction to Paresh. After the meeting, Paresh spoke to me. Shekhar, I Leaves to You Malad Highway from my vehicle. I'm going to be from there. I do not have a good introduction to a Paresh in that time. In the Branch to the head office or head office to home. When Paresh was with me. If there is any doubt in the work then my first phone to call to Paresh and is still there. One of them is that when we present the subject before him, the first subject is presenting the topic while he is presenting the subject and he gives the correct answer. So, not just in the case, but what is something to say, I share with him. In fact, it is less as much as you write as a friend about him. There is a lot of that, a sincere friend's friend. But till today, I got a very many friendly circle but it is very special with the executive. This is what I wrote about him, that we just met in the evening, and we would like to meet up in the evening and we want to leave. He was 11.15 to take his vehicle and then he went to my home for drop to me and then went to his home.I don't want to describe my friendship with him in such words. But it gave way to my emotions. Wildwhile to me that always lives a happy environment in his life. Life is all about, enjoy every golden movements.

Thanks Parya.. !!

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

कोव्हिड - १९ आणि युद्धभूमी धारावी


महाराष्ट्रात कोव्हिडला सुरुवात झाल्यानंतर काही २-३ महिन्यांनी मुंबईतील धारावी येथे असलेली परिस्थिती फारच वाईट होत चाललेली. दिवसेंदिवस तिकडे कोव्हिडचे रुग्ण वाढत चाललेले, वृत्तपत्र व टिव्हीवर तिकडच्या सर्व माणसांचे हाल बघून डोक्यात सारखे विचार येत होते की हे प्रसंग आपल्यावर ओढावले तर आपले काय हाल होतील? फक्त रात्री न्यूज वर कोव्हिड रुग्णांचा एक सारांश घ्यायचा आणि नंतर झोपण्याचा प्रयत्न करायचं असं सर्व सुरवातीला व्हायचं. त्यावेळी सर्व काही ठप्प झालेलं, इमारतीच्या बाहेर जाण्यासाठी काय कोणाला परवानगी मिळत नव्हती. त्यावेळी इमारतीच्या खाली एक माझ्याकडून एक दैनंदिन कार्यासाठी मदत म्हणून, मी माझा काही वेळ देत होतो. त्याचवेळी मला माझा मित्र सुहृद याचा फोन आला आणि बोलला की शेखर चल आपण या ओढावलेल्या संकटावर एक माणुसकीच्या नात्याने आपण मदतकार्य करूया. कुठे तर धारावीमध्ये स्क्रिनिंग कार्यासाठी आपण निघुयात, तू मला तुझं लवकरच कळव. मी फक्त एकाच दिवसात माझा होकार कळवून दिला व लगेच सुहृद ने त्याच्या वरिष्ठांशी बोलून घेतले व आमच्या दोघांची उपलब्धता कळवली. ह्या सर्वात मी माझ्या आईबाबांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाच कळू न दिलेले होते कारण काय आहे शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पातळी ही वेगवेगळी असते आणि माझ्यामुळे इतर कोणाला झालेला त्रास हा मला तरी सहन नसता झाला. सुहृदने उपलब्धता दिल्यावर त्याच संध्याकाळी मालाड पश्चिम येथील साई पॅलेस ह्या हॉटेल मध्ये आमची ट्रेनिंग होऊन पुढच्या दिवसासाठी सज्ज झालो ह्या सर्वात विशेष आभार मानावे तर माझे सदैव आदरणीय असलेले CA श्री.श्रीकांतजी व. मराठे व माझ्यासाठी मित्रत्व तसेच प्रसंगी आईसारखं प्रेम देणारी श्रीम. अदिती श्री. मराठे यांच्या विषयी सांगू तितकं कमी असेल. स्क्रिनिंगच्या दिवशी श्रीकांत सर व अदिती काकी खास त्यांची गाडी घेऊन सुहृद व मला सोडण्यासाठी आलेले. आपण धारावी मध्ये जाणार त्यामुळे थोडेफार विचार माझ्या मनामध्ये घोळतच होते पण मराठे कुटुंबीय सोबत असल्यामुळे मी माझ्या भितीपणाला सावरू शकलो व जागोजागी पुढचा विचार करू शकलो. ह्या सर्वात मला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं एकच वाक्य आठवतं जे मला माझ्या श्रीकांत सरांनी आठवण करून दिलेलं ते म्हणजे
देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. ह्या वाक्याला समोर ठेऊन मी व सुहृदने हे सकारात्मक पाऊल उचलले, आमच्या व्यतिरिक्त तिथे सुद्धा असंख्य तरुणाई होती जी मुंबईच्या व मुंबईच्या बाहेरून येऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवा करत होती. तिथे गेल्यानंतर आम्ही चिलखत म्हणून असलेले पी.पी.ई किट घातल्यानंतर मी एका समूहात व सुहृद एका समूहात अशी परिस्थिती झाल्यावर, आम्ही अश्या परिस्थितीत आमच्या समोर असलेल्या मोठ्या आव्हानाला सामोरं जाऊन पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. सर्व काही आमचं ठरल्याप्रमाणे झाल्यावर नंतर जेवण वैगरे झाल्यानंतर गाडीमध्ये आल्यावर मनाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद झालेला की आमच्या मदतीचा एक खारीचा वाटा या समाजासाठी अर्पण झाला. माझ्या समोर तर एकवेळ असा पण प्रश्न उपस्थित झालेला की इथून मी घरी व्यवस्थित जाईन की नाही पण जर घरी नाही गेलो तर समाजासाठी व राष्ट्रासाठी नक्कीच काहीतरी देऊन गेलो याचा एक प्रकारचा अभिमान चेहऱ्यावर फुलत राहिलेला असेल. आज हा दिवस आठवला व ह्याबद्दल मनाच्या वाटा मोकळ्या करून घेतल्या. खरंच श्री. श्रीकांत मराठे व कुटुंबीय यांचे मनापासून आभार..


राष्ट्रप्रथम!!!


--/चंद्रशेखर सावंत



बुधवार, ६ जानेवारी, २०२१

एक आठवणीतला अविस्मरणीय कळसूबाई शिखर

जून महिन्याची सुरवात झाली का वेध लागतात ते गिरी शिखरांवर जायचे वेध लागतात ते निसर्गाच्या सानिध्यात रमण्याचे, वेध लागतात ते सह्याद्री समोर स्वतःला नतमस्तक करवून देण्याचे. अशाप्रकारे प्रत्येक पावसाळा हा माझ्यासाठी किंवा इतर कोणाला खास हा असतोच. एक २०१९ वर्षाची आठवण म्हणजेच च्या पावसाळ्यातील आठवण सांगायची झाली तर आम्ही मित्र परिवार समवेत सर केलेला कळसूबाई शिखर.

काही प्रवास असे असतात की आयुष्याच्या शेवट पर्यंत लक्षात राहतात. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई शिखर. खरंतर ट्रेक म्हटलं की नियोजन नसून सुद्धा क्षणोक्षणी निघायचे बेत तयार होतात ती मज्जा म्हणजे त्या त्या वेळेलाच कळते. मला शुक्रवारी विनायक चा सकाळी फोन आला आणि म्हणाला की उद्या रात्री आपल्याला कळसूबाईला निघायचे आहे. सकाळी झोपेतून त्याला होकार दिला की निघू म्हणून. तर ठरल्याप्रमाणे शनिवारी म्हणजेच १४ जूनला रात्री मी, विनायक, जितेश, सोहेल, अखिलेश व अमित हे मालाड स्टेशन वरून दादरसाठी रवाना झाले. दादर वरून आम्ही 'अमृतसर एक्स्प्रेस' दिसताच ती ट्रेन फलाटावर लागल्यानंतर सुटेल या भीतीने पुढच्या दिशेला आम्ही लगेच चढलो पण नंतर आत गेल्यावर कळाले की हा डब्बा आर्मी चा आहे. डब्बा पूर्ण स्वच्छ व आर्मी मधील जवान त्यात होते. गिर्यारोहण चा समूह गप्पा गोष्टी व आठवणी शेयर करत आम्ही ३.३० च्या आसपास आम्ही इगतपुरी या स्थानकाच्या इथे पोहोचलो तिथे पोहोचताच आम्ही एस.टी. स्टँड गाठले व तिथे सकाळी ४ च्या आसपास नाष्टा पाणी वैगरे करून घेतले पण कसली भयाण शांतता व काळोख होता तिथे. तो एस.टी.स्टँड न वाटता एक खुले मैदान व एक व्यासपीठ असंच वाटत होतं तिथे. त्यात नाष्टापाणी झाल्यावर जरा एस. टी स्टँड वर पडायचे म्हटले तर तिथे थोडीफार भिती वाटायला लागली कारण आम्हाला तो विभाग नवीन होता. म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला दिवा असल्यामुळे तिथे येऊन बसलो. थोड्यावेळातच आमच्या डोळ्यावर झोप येऊ लागली व रस्त्यावर पाट टेकून आकाशात चांदण्याच्या छताखाली असलेला आनंद फार मनाला स्वच्छंदी करणारा होता पण काही वेळेतच अचानक तो दिवाही गेला व रस्त्यावरचे कुत्रे भुंकायला लागले हे सर्व बघून आमची झोपच उडाली म्हणून थोड्या वेळात लाईट येताच आम्ही जवळच्या ठिकाणी फेऱ्या मारायला सुरुवात केली. फेऱ्या मारताच जरा पुढे गेल्यावर एक आजी खाटेवरून उपडी पडून एकटक आमच्या समूहाकडे बघतच होती, हे असं दृश्य बघताच आम्हाला काय तिथे थांबावेसे वाटले नाही व परत एस.टी. स्टँड च्या इथेच आलो. सकाळी ०५.३० वाजता बारी या गावी जाणारी एस.टी. आम्हाला स्टँडला उभी असलेली मिळाली व बस मध्ये बसताच आम्ही थोडी झोप घेतली. बारी या गावी पोहोचताच मनाला एक विशिष्ट आनंद मिळू लागला की जे नाव आम्ही शाळेत असताना फक्त भूगोलात बघितलेले त्या नावाचं शिखर आम्ही सर करण्यास राजी झालो आहोत म्हणून. स्थानकाजवळ असलेल्याच खानावळी मध्ये आम्ही चहापान करून घेतला व पुढच्या दिशेला मार्गस्थ झालो. कळसूबाई सर करताना एक विशिष्ट आनंद मनाला भासवत होता. निसर्गाच्या कुशीत जगताना एक नवी उमंग आपल्याला साथ देत असते हे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावरच कळतं. मार्गस्थ होत असतानाच आम्हाला कळसूबाई चे मंदिर दिसले तिथे नमस्कार करून पुढेच्या चढाई श्रेणी साठी सज्ज झालो वाटेत निसर्ग मस्त ताजेतवाने झालेला व त्या सोबत आम्हाला सुद्धा अगदी चैतन्यमय वातावरण भरवून देत होता व सांगत होता की या तुमच्या स्वागतासाठी मी सज्ज आहे. निसर्ग समवेत फोटोसेशन वैगरे झाल्यानंतर आम्ही अजून वर वर जात होतो तस तसे आम्हाला धुक्याचा सहवास लाभत होता व स्वर्गात पोहोचल्याचा भास जाणवू लागला.

अक्षरशः डोक्यावर व दाढीवर सुद्धा दवबिंदू तयार झालेले इतक्या थंड प्रमाणात वर वातावरण होतं व तितकीच हवा सुद्धा. थोड्या अंतरावर आम्हाला कळसूबाईचा शेवटचा वरचा पॅच आला व तिथे सुद्धा अफाट हवा होती अक्षरशः कपडे फडफड नुसते वाऱ्याने उडत होते. तिथे थोडा तासभर घालवताच आम्ही वर असलेल्या मंदिरात कळसूबाई मातेचे दर्शन व परतीच्या दिशेला निघालो. खाली उतरताना लगेचच जलदगतीने पण सर्व काळजीपूर्वक आलो व पूर्ण खाली येताच पावसाने हजेरी लावली म्हणजे कळसूबाई यशस्वी पूर्ण झाला म्हणून पावसाने केलेले आमचे स्वागत, असे भासू लागले. पायथ्याशी पोहोचताना उतारा असल्यामुळे सरकत समोरच शेत असल्याने आम्ही अगदी लहान समजून त्या शेतात नाचू लागलो आणि शेतातली माती किती भुसभुशीत असते हे सर्वांना माहीतच असेल त्यामुळे अजुन मज्जा केली. पुढे बारी गावच्या दिशेला पोहोचताच चहापान करताच आम्ही एस.टी. ची वाट बघू लागलो पण एस.टी. काय अजुन येईना. ५.३० झाले तरी काय अजुन एस. टी येईना. शेवटी आम्हाला जीप मिळाली पण ती सुद्धा पूर्ण भरलेली म्हणून त्या जीप चालकानेच सांगितले की तुम्ही जीप च्या टपावर बसा.. व आम्ही सर्वजण बसलो सुद्धा व पुन्हा एकदा जीवाची मज्जा लुटून घेतली.. आयुष्यात आजपर्यंत खूप ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात फिरलो पण कळसूबाई चा पाहिलं गिर्यारोहण हे असं सर्व घडल्यामुळे हा प्रवास आयुष्याच्या शेवट पर्यंत लक्षात राहील.

आपलाच
--/🌝शेखर सावंत

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

अलविदा २०२०

चालु झालेलं नवीन वर्ष आणि अचानक मार्च महिन्यापासून आलेली कोविड १९ ची संक्रमकता ते २०२० च्या अखेरपर्यंत व पुढे हे सर्व कधी संपेल ह्याचं उत्तर अद्याप आलेलं नाही. ह्या सर्वात अफाट गोष्टी शिकण्यासारख्या मिळाल्या.. काळ आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टींचा ह्या वर्षात चांगलाच अभ्यास झाला जो आयुष्याच्या शेवट पर्यंत कामी येईल, पण खरंच असं मनापासून वाटतं की २०२० ह्या वर्षासारखा अजून कोणता वर्ष परत कधी आयुष्यात नकोचं! कारण काळ व वेळ ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास सहज सहज स्पष्ट झाला. खरंतर हे होणं गरजेचचं होतं.. आपल्या सर्वांवरच असलेल्या कोविड १९ च्या संक्रमकतेनुसार काही उद्भवलेल्या प्रसंगावर, मी स्वतः वास्तविक प्रक्रियेवर किती ह्यावर स्पष्ट होतोय ह्याचा अंदाज माझ्याकडून मलाच स्पष्ट झाला.. हे सर्व स्पष्ट झालं हिच मोठी बाब आहे. असं म्हणतात इतरांशी आपल्याला काय घेणं देणं... पण ह्या कोविड १९ च्या परिस्थितीत इतरांच्या वाट्याला जेव्हा दुखः येतात तेव्हा त्यांच्याकडचीचं माणसं जेव्हा वेळेनुसार पाठ फिरवतात तेव्हा ते फक्त बघून सुद्धा फार वाईट वाटतं. इथे सरळ सरळ रंगबदली सरडा म्हणून सहजपणे स्पष्ट होतो.

ह्या वर्षात मी एक नाराजीने विशेष म्हणून इथे उल्लेख करेन की गिर्यारोहण क्षेत्राकडे माझे ह्या वर्षात कमी पाऊल वळले गेले, गिर्यारोहण क्षेत्रातले माझे सर्व अफाट जिवलग मित्रपरिवार दुरावले गेले, ह्याचा प्रचंड मनस्ताप मला सहन करावा लागला, ह्या मनस्तापामुळे माझी प्रत्यक्षात व्यक्त होण्याची इच्छाशक्ती माझ्याकडून नाहीशी झाली. काही बाबींमुळे तर मनमोकळे होण्यासाठी लोणावळा येथे काही वेळा मनशांती साठी जावे लागले, पण हे सर्व व्यर्थ आहे कारण जिथे माझे ट्रेकर्स बांधव नाहीत तिथे तिथे मला स्वर्ग मिळणे कठीणच! गिर्यारोहण क्षेत्रातल्या माझ्या सर्व बंधू भगिनींवर हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींचा असा आशीर्वाद असल्यामुळे, त्यांच्याकडे एक मोठ्या मनाची समंजसता असल्यामुळे ते मला ओळखू शकतील ह्यात तिळमात्र शंका नाही. ह्यापुढे मी अजून काही म्हणू शकत नाही. तरी सुद्धा मनावर एक प्रश्न येतोच येतो की एवढ्यावरच आपण हरायचे का? तर उत्तर सरळ सरळ नाही येतं... आयुष्य आहे शेवटी चालायचचं!

मला काही जणांचं सांगणं असतं की काय नुसतं तुम्ही प्रत्येक गडांवर भेट देत असता त्या सर्वांना माझं सांगणं असेल की जेवढे चढ उतार आम्हाला ट्रेक मध्ये येतात ना.. तेवढे आम्ही दैनंदिन आयुष्यात बघतो व त्यांना पार कसे करायचे. ह्याचं गुपित त्या माझ्या छत्रपती शिवरायांच्या अस्मितेवर आहे.. 

ह्या सर्वांना तोंड देण्याचा अभ्यास व आमच्या नसानसात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीतून चढाई करताना जेव्हा घामाच्या धारा निघतात तेव्हा शिवरायांचा सहवास आम्हाला लाभल्याचा पुरेपूर आनंद होतो.

आयुष्यात चढ उतार नाही आले मग ते आयुष्य कसलं? एक पारदर्शी स्वभावामुळे पहिल्या पासून कमावलेल्या व्यक्ती आहेत त्यांचा सहवास मला फोन द्वारे होत होताच पण प्रत्यक्षात भेट होणं व त्यांच्याशी मनमोकळे पणाने बोलणं हे सर्व ह्या वर्षात शक्य नाही झालं ह्याची खंत मला ह्या वर्ष अखेरीस खूप वाटते. असं सर्व असल्यामुळे व काही खाजगी कामात असल्यामुळे काही सवंगड्यांचे कॉल्स मला उचलता नाही आले. ह्याचा मला नंतर स्वतःलाच त्रास वाटू लागलेला..पण २०२० ह्या वर्षअखेरीस असं वाटत आहे की येणारा २०२१ हा वर्ष खूप आणि खूप काही सकारात्मक गोष्टी घडवून आणणार आहे. ही दूरदृष्टी ठेऊन नवीन वर्षात पदार्पण करण्यास मी सज्ज असून ही इच्छा शक्ती मनावर ठेऊन आत्ता नवीन वर्षाचं स्वागत करायला मी मनापासून तयार आहे..


येणाऱ्या २०२१ च्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.. 
 
--/ चंद्रशेखर सावंत 

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

प्रथम तुला वंदितो...

 




  

आपल्या हिंदू धर्मात श्री गणेशाला फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते तसेच ६४ कला असलेल्या अधिपती गणरायाला विद्येचे दैवत मानले जाते.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान व गुजरात या ठिकाणी व तसेच भारताच्या बाहेर स्थलांतरित झालेले आपले भारतीय परदेशात सुद्धा हा सण मोठ्या थाटामाटात अगदी मनापासून व आवर्जून साजरा करतात. महाराष्ट्रातले कोकणी माणसे तर न चुकता दरवर्षी गौरी-गणपती मध्ये कोकणात हजेरी लावतात. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर या काळात गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची लहान मूर्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या मुर्त्या आणून अगदी मनोभावे त्याची पूजा सर्व मंडळी करतात.

या गणेशोत्सव काळात गणराया समोर भक्तिभावाने अथर्वशीर्ष व रोज सकाळी व रात्री त्याच्यापुढे आरती म्हटली जाते तसेच मोदकाचा किंवा लाडूचा प्रसाद दिला जातो. काहींच्या घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी दिड, पाच, गौरी - गणपती विसर्जन, सात तसेच अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत, तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते.

१८९२ साली गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली. पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जनजागृती निर्माण व्हावी हा हेतु त्यामागे होता. जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण आदरणीय लोकमान्य टिळकांनी त्याला अकरा दिवस चालणाऱ्या सामाजिक उत्सवाचे रूप दिले. या उत्सवाच्या निमित्ताने भारतातील जनता एकवटेल. त्यातील सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांच्या रुपाने तिच्यात जनजागृती निर्माण करता येईल. आपली संस्कृती आणि धर्म याबाबत प्रत्येक नागरिकांच्या मनात एक अस्मिता जागृत होईल अशी ही भावना लोकमान्य टिळकांच्या मनात होती व सर्व भारतीय लोकांनी आपापसामधील भेद सोडून एकत्र यावे ही लोकमान्य टिळकांची मुख्य इच्छा होती.

आजच्या परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या गणेशोत्सोवात किती गणेशोत्सव मंडळांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आठवण येत असेल? असा प्रश्न जर समोर आला तर फार क्वचित सार्वजनिक मंडळे समोर येतील. लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवातून समाजप्रबोधन व्हावे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. तसेच त्यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही गोष्ट अगदी खरी. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी तरुण पिढींमध्ये राष्ट्रप्रेम जागृत केलं. त्यानुसार काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. कलाकारी असलेल्या व्यक्तींच्या कलागुणांना वाव देऊन, सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडेल असे उपक्रम राबविले जात असत व आजही हे उपक्रम राबविले जात आहेत. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात तसेच चलचित्र उभारून यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक एकोपा जपासावा यासाठी देखावे उभारतात. वक्त्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून, व्याखानमाला आयोजित केल्या जात असत. आजही ही प्रथा चालू ठेवणारी गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्या अनुभवाने मार्गदर्शनातून नवीन पिढीला योग्य दिशा मिळू शकेल. पर्यावरणाला त्रासदायक असणाऱ्यांचा वापर कमी केला पाहिजे. अशा पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा झाला तरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली जाईल.

दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात राजेशाही थाटात येणारा व राजेशाही थाटातच विसर्जनाला निघणारा आपला गणपती बाप्पा ह्या २०२० साली कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियमावलीनुसार आला. कुठेही काय पर्यावरणाला त्रास होणार नाही अश्या स्वरूपात त्याचे आगमन व विसर्जन होणार. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे जर आपण बघत गेलो तर अतिशय योग्य आहे. तसेच आपल्या दृष्टिकोनातून सुद्धा कारण आपण कोविड १९ संसर्गापासून सार्वजनिक अंतराचे भान जपण्यास भाग पडू, यामुळे आपण जर का स्वतः व्यवस्थित राहिलो तर पुढच्या वर्षी उत्साहाने व भक्तिभावाने गणेशोत्सव पुन्हा साजरा करू शकतो.

भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. माहितीप्रमाणे गणेश चतुर्थीची प्रचलित कथा अशी आहे की एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. म्हणून गणपतीने तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही असा चंद्राला शाप दिला.

शिवपुराणमधील माहितीनुसार पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी भगवान शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून आत प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित झाली. शेवटी माता पार्वतीने सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती तयार केली. या पुत्रास तिने स्वतःचा रक्षणकर्ता म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार बालकास दारी नेमून पार्वती स्नानास गेली व काही वेळेतच भगवान शंकर तेथे उपस्थित झाले. बालकाने शंकरास अडवले. पहिल्यांदा पहिल्यांदा या बालकासोबत त्यांचा वाद व युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही बातमी ऐकून पार्वतीने रुद्र अवतार धारण करून सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी तिला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनः जन्माची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी देवगणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण असलेल्या पैकी एक हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने या बालकास जिवंत केले व शिवशंकरानी यास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा बालक प्रथम पूज्य झाला.

गणपती हा महाभारताचा लेखनिक होता. गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश व तसेच प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव यास आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तोंड वक्र आहे असा तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. माहितीनुसार भगवान परशुराम जेव्हा कैलास पर्वतावर निघत होते तेव्हा असुर परशूरामांच्या सावली मध्ये वेश धारण करून परशुरामा बरोबर कैलास पर्वतावर प्रवेश करत होता, हे वेळीच श्रीगणेशाने ओळखले व भगवान परशुरामांची वाट अडवून राहिला, गणरायाचे वाट अडवल्यामुळे रागाच्या भरात परशुरामाने हातात असलेल्या शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला व त्यात त्याच्या एका दाताला शस्त्र लागताच तुटून खाली पडला तेव्हापासून त्याचे एकदंत नाव पडले. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपती व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाव प्राप्त झाले. अश्या बऱ्याच कथा आपल्याला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे किंवा पुस्तकी वाचनातून माहीत पडते.

मुंबईत राहत असलेल्या ठिकाणी गणरायाच्या समोर सहज बसलो होतो गणरायाचे मोहक रूप बघून सतत त्याच्याकडे बघत व तिथेच त्याच्या बरोबर रहावेसे वाटते. त्याच्या सुंदर रुपात भारावून जाताना बाप्पा काहीतरी बोलतोय असे मला भासू लागले. मग अशी मिळालेली सुवर्णसंधी आपण सोडायची कशाला? त्यावर त्याने सांगितले की आजकाल ह्या तुमच्या पिढी मध्ये मज्जा करण्याची वेगळीच पद्धत आहे. त्या मोठ्या ‘दूरध्वनिक्षेपक’ (D.J.) मध्ये तर कानाला दडा जातो अशा कर्कश आवाजात त्याचे ध्वनी वाढवून ठेवतात. ह्यामुळे पर्यावरणातील इतर सजीवांना सुद्धा त्रास होतो, काही प्राणी ‘कर्ण-बधिर’ सुद्धा होतात, गेल्या २-३ वर्षांपासून ह्यावर बंदी घातली म्हणून ठीक आहे. ‘P.O.P’ च्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे खूप प्रमाणात व जलचर सजीवांची सुद्धा खूप हानी होते. तसेच जागतिक हवामानावर सुद्धा याचा परिणाम होतो. याची तुम्हाला कल्पना आहे का? पण बाप्पाची नाराजी वाढू नये म्हणून मी नंतर जरा मज्जेचा विषय चर्चेत आणला. त्याला म्हणालो की तुला मागील वर्षी झालेल्या ‘भजन-नाट्य’ तसेच ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ या मध्ये कशी मजा आली? यावर बाप्पा लगेचच खुश झाला, आणि म्हणाला की मज्जा तर आलीच, पण पुढच्या वेळी आणि कायमस्वरूपी हीच परंपरा राहूदे, हे ऐकून मला सुद्धा खूप बरे वाटले, मी त्याला उत्तेजितपणाने म्हणालो नक्कीच! असाच गणेशोत्सव मनापासून दरवर्षी अगदी पर्यावरणाला त्रास होणार नाही तसेच भक्तिभावाने साजरा होऊदे ह्याच माझ्या इच्छा असतात. अशाप्रकारे भावनिक संभाषण झाल्यावर आत्ता अनंत चतुर्थीला आपल्या लाडक्या गणरायाची निरोप घेण्याची वेळ येईल व दरवर्षीप्रमाणेच गणराया नजर चुकवून जाताना दिसणार, कदाचित आत्ता आपल्या भेटीस एक वर्षाचा अवकाश असेल म्हणून कदाचित तोही आपल्यापेक्षा नाराज होईल. ह्या सर्व तेथे भावना व्यक्त होत होत्या. विशेष म्हणजे कोविड १९ च्या कालावधीत साजरा झालेला गणेशोत्सव, सकारात्मक विचारांसाठी खूप काही प्रेरणा देऊन गेला.

विघ्नांचा नियंत्रक असलेल्या श्री गणरायाच्या चरणी सर्व त्याच्या भक्तांकडून प्रार्थना असेल की कोविड-१९ हा रोग संपूर्ण जगातून पूर्णतः नष्ट होवो व पुढचे सर्व दिवस आनंदी जावो.

 

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...

 

--/ चंद्रशेखर सावंत